विकसित भारताच्या प्रगतीत महिलांचे मोठे योगदान ः तांबे
नायक वृत्तसेवा, संगमनेर
आजची स्त्री सुशिक्षित झाली असून बालविवाह, स्त्री भ्रूण हत्या याचे प्रमाण कमी झाले असले तरी पूर्णतः थांबलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. यासाठी सावित्रीच्या लेकींनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. आपली जबाबदारी ओळखून महिलांनी नेहमीच अन्न, पाणी व वीजेची बचत करुन समाजापुढे आदर्श निर्माण करावा. यातूनच सर्वांची सर्वांगीण प्रगती साधली जाणार असल्याचा विश्वास व्यक्त करुन महिलांच्या प्रगतीमुळेच समाजाची व देशाची खरी प्रगती झाली असल्याचे प्रतिपादन संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमीत्त संगमनेरातील यशोधन कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात महिलांच्या सबलीकरणासाठी विविध योजना राबविल्या जात आहे. कुटुंबात महिला हा महत्वाचा घटक असून अनेक महत्त्वाची दैनंदिन कामे महिलांना पार पाडावी लागतात. विशेषतः ग्रामीण भागातील स्त्रियांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. यासाठी महिलांनी अधिक जागृत राहून काम करणे गरजेचे असल्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी यशोधन कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.