घारगाव वन परिमंडलाकडून नुकसानग्रस्त पशुपालकांना दीड लाखांची मदत! पंधरा पशुपालकांना आर्थिक मदत केल्याने मिळाला दिलासा; अद्यापही बिबट्यांची दहशत कायम

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. यामध्ये पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाळीव प्राण्यांवर हल्ला करत ठार केल्याने पशुपालकांचा आर्थिक स्त्रोत बंद झाला. या पार्श्वभूमीवर बिबट्याच्या हल्ल्यातील नुकसानीचे पंचनामे करुन घारगाव वन परिमंडल विभागाने पठारभागातील पंधरा शेतकर्‍यांना 1 लाख 64 हजार रुपयांची शासन मदत केली आहे. यामुळे पशुपालकांना दिलासा मिळाला आहे.

दिवसेंदिवस पठारभागात बिबट्यांची संख्या वाढल्याने शेतकर्‍यांसह पशुपालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. त्यातच वनक्षेत्र जास्त असल्याने बिबट्यांचा संचार कायमच येथे अनुभवयास येतो. तरी देखील शेतकरी आणि पशुपालक उदरनिर्वाह करण्यासाठी बिबट्याच्या दहशतीखाली कामे उरकतात. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. यासाठी शेळ्या, मेंढ्या, गायी व म्हशींचा सांभाळ पशुपालक करतात. परंतु, हिंस्र श्वापद म्हणून ओळख असलेले बिबटे भक्ष्य म्हणून या पाळीव प्राण्यांवर हल्ला करुन भूक भागवतात. यामध्ये पशुपालकांचे मोठे नुकसान होऊन अक्षरशः आर्थिक स्त्रोत बंद होतो. या पाळीव प्राण्यांवरील हल्ल्याची वन विभागही तात्काळ दखल घेऊन पंचनामे करतात. त्यानुसार शासनाकडून नुकसानग्रस्तांना मदतीचा धनादेश दिला जातो.

या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना घारगाव वन परिमंडलाकडून पंधरा शेतकर्‍यांना 1 लाख 64 हजार रुपयांची शासन मदत केली आहे. यामध्ये साकूर येथील पशुपालक विठोबा रेवजी खेमनर, बावपठार येथील दत्तात्रय दगडू डावखर, अकलापूर येथील भगवंत दादाभाऊ कापसे, खांडगेदरा येथील शिवराम शंकर गावडे, अकलापूर येथील योगेश रावसाहेब सहाणे, खांडगेदरा येथील आदिनाथ मंजुळा ढोकरे, अकलापूर येथील सुनील तुकाराम पारधी, केळेवाडी येथील जनार्दन रामजी लामखडे, अकलापूर येथील अर्जुन महादू गायकर, माळेगाव पठार येथील सुदाम पंढरीनाथ गोडे, आंबी दुमाला येथील हौशाबापू शहाजी खेमनर, म्हसवंडी येथील दामोदर तुळशीराम इथापे, शेळकेवाडी अनिल ज्ञानदेव गाडेकर असे पंधरा पशुपालकांचा समावेश आहे.

आमच्या अखत्यारित येणार्‍या परिसरातील नुकसानग्रस्त पालकांना पंचनामे करुन उपविभागाीय वनाधिकारी गणेश झोळे, भाग एकचे वनक्षेत्रपाल अधिकारी नीलेश आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाची मदत केली आहे. मात्र, शेतकर्‍यांनी आपल्या पाळीव प्राण्यांचा बचाव करण्यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
रामदास थेटे (वन परिमंडल अधिकारी, घारगाव)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *