एक्झिट पोलचे अंदाज चुकले, एनडीए बहुमताच्या दिशेने…!
एक्झिट पोलचे अंदाज चुकले, एनडीए बहुमताच्या दिशेने…!
नितीश कुमार यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे खराब; भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता
नवी दिल्ली, वृत्तसंस्था
बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या काही फेर्यांमध्ये महाआघाडीने मोठी बढत घेतली होती. मात्र, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीचा आकडा कमी होताना दिसत असून, एनडीएचा आकडा वाढू लागला आहे. सध्या 243 मतदारसंघातील चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. सध्या एनडीए 127 जागांवर आघाडीवर आहे. यात भाजपा 73, जदयू 47, तर व्हीआयपी पक्षाचे 7 उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे महाआघाडी 100 ठिकाणी आघाडीवर आहे. यात राजद 61, काँग्रेस 20, डावे 19 जागांवर आघाडीवर आहेत. यामुळे एक्झिट पोलचे अंदाज चुकले असून एनडीए बहुमताच्या दिशेने मार्गक्रमण करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
स्वत: नितीश कुमार यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नसून ती काहिशी खराब असल्याचे स्पष्ट होत आहे. पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षापेक्षा त्यांच्या आमदारांची संख्या कमी होताना दिसत आहे. मात्र, अजूनही ब्रँड नितीश धुसर झालेला नाही, असे नितीश कुमारांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. मात्र यावेळी अँटी इन्कम्बन्सीचा फटका नितीश कुमार यांन बसू शकतो असे त्यांचे म्हणणे आहे.
चिराग पासवान आणि कोविडमुळेच जनता दल युनायटेडची कामगिरी खराब होत असल्याचे नितीश कुमार यांच्या टीमने म्हटले आहे. 38 वर्षीय चिराग आपल्या संपूर्ण निवडणूक प्रचारादरम्यान नितीश कुमार यांना निशाणा बनवले होते. चिराग पासवानांचा लोक जनशक्ती पक्ष हा केंद्रात एनडीएचा घटक पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाने सुरुवातीलाच चिराग पासवान यांना वेगळे करायला हवे होते, असे जेडीयूचे प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी म्हटले आहे. पासवान यांच्यावर सुरुवातीपासूनच नियंत्रण ठेवायला हवे होते, असेही ते म्हणाले. चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्या वोटबँकेला खिंडार पाडल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. चिराग पासवान यांना बंडखोरी करण्यास भारतीय जनता पक्षानेच सांगितले असल्याचा भाजपचे टीकाकार आणि नितीश कुमार, तसेच त्यांच्या सहकार्यांचा अंदाज होता. बिहारच्या राजकारणातील नितीश कुमार यांचे महत्व कमी करणे हा यामागील उद्देश होता. यामुळे जुन्या सहकार्याच्या भविष्याचा फैसला भारतीय जनता पक्षाच्या हातात येईल अशी स्थिती दिसत आहे.