रतनवाडीमध्ये राज्यस्तरीय गिर्यारोहण शिबिर 353 विद्यार्थ्यांनी अभ्यासली आदिवासी संस्कृती
नायक वृत्तसेवा, राजूर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ आणि डॉ. डी. वाय. पाटील यूनिटेक सोसायटीचे डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने रतनवाडी, कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य येथे राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक आदानप्रदान गिर्यारोहण शिबिर पार पडले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ व प्राचार्य डॉ. मोहन वामन हे 1997 पासून कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील रतनवाडी येथे राज्यस्तरीय गिर्यारोहण शिबिर घेत आहेत. या शिबिराचे हे 26 वे वर्ष होते. 3 मार्च ते 6 मार्च दरम्यान झालेल्या या शिबिरात राज्यभरातून 353 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सर्व विद्यार्थ्यांना रॅपलिंगचे प्रशिक्षण, रतनगडचे ट्रेकींग करण्यात आले. तसेच रतनगड व रतनवाडी गावची स्वच्छताही विद्यार्थ्यांनी केली. शिबिरार्थींसाठी त्या भागातील आदिवासींच्या सण-उत्सवाची गाणी, जोहार याची माहिती देणारे कार्यक्रम तसेच व्याख्यानाचे आयोजनही करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना वनस्पती व पक्षी अभ्यास या विषयावर मिलिंद बेंडाळे, औषधी वनस्पती विषयावर प्रा. सुभाष वर्पे तर देवराईबद्दल प्रा. संदीप देशमुख यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डा. मोहन वामन विविध वनस्पती प्रत्यक्षात दाखवून त्या वनस्पतीबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. रानकवी तुकाराम धांडे यांच्या कवितांचे सादरीकरण झाले.
शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, बी. एस. टी. महाविद्यालय संगमनेरचे प्राचार्य डॉ. डी. डी. पाटील, रतनवाडीचे माजी सरपंच पांढरे, सरपंच संपत झडे उपस्थित होते. याप्रसंगी शिबिरास सहकार्य करणार्या प्रदीप सुर्वे, राजेंद्र गोडगे, हौशीराव सोनवणे, नानासाहेब वामन, उत्तम सुर्वे, सुदाम कदम, कैलास देशमुख, डॉ. महेंद्र ख्याडे, प्रा. नामदेव बांगर, पत्रकार विलास तुपे, संजय महानोर यांना सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. गणेश फुंदे, सूत्रसंचालन प्रा. भागवत देशमुख तर आभार विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. मुकेश तिवारी यांनी मानले. या शिबिराच्या नियोजनात डॉ. मीनल भोसले, प्रा. खालिद शेख, प्रा. राधाकृष्ण ठाणगे, प्रा. चेतन सरवदे, प्रा. मयूर मुरकुटे, प्रा. सतीश ठाकर, प्रा. रोहित वरवडकर, प्रा. दीपाली निंबाळकर यांनी सहभाग घेतला.