दांडी यात्रेप्रमाणेच भारत जोडो यात्रा ऐतिहासिक ः थोरात महागाई, बेरोजगारी आदी प्रश्नांवर उठविताहेत आवाज


नायक वृत्तसेवा, संगमनेर
जाती-धर्माच्या नावावर देशात राजकारण सुरू असून वाढलेली महागाई, बेरोजगारी याविरुद्ध आवाज उठवत प्रेमाचा व एकतेचा संदेश देणारी खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा ही महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील दांडी यात्रेप्रमाणे ऐतिहासिक ठरणार असल्याचे गौरवोद्गार भारत जोडो यात्रेचे समन्वयक आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले.

खासदार राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर ही सुरू असलेली भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात असून महाराष्ट्रातील सर्व ठिकाणच्या तयारीचे व नियोजन जबाबदारी विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर असून ते यात्रेचे समन्वयक आहेत.

याविषयी बोलताना आमदार थोरात म्हणाले, भारत जोडो यात्रेमध्ये देशभरातील पुरोगामी विचारांच्या संघटना आणि मित्र पक्षांचा मोठा पाठिंबा लाभत आहे. महाराष्ट्रात देगलूर येथे आगमन झाल्यानंतर खासदार राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सुरू झालेल्या या यात्रेचे राज्यातील जनतेकडून अभूतपूर्व स्वागत झाले आहे. प्रेमाचा आणि एकतेचा संदेश देणारी यात्रा असून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेप्रमाणे ही यात्रा ऐतिहासिक ठरणार आहे. दांडी यात्रेने देशात क्रांती केली देश एक केला त्याचप्रमाणे भारत जोडो यात्रेतून सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून देशहिताची व प्रेमाची ही ऊर्जा एक ऐतिहासिक चळवळ ठरणार आहे.

या यात्रेमध्ये साहित्यिक, कवी, संपादक, लेखक यांच्यासह विविध घटकांतील लोक सहभागी होत आहेत. गोरगरीब, मजूर, शेतकरी, कष्टकरी महिला यांचा मोठा सहभाग राहिला असून खासदार राहुल यांच्या नेतृत्वाखाली प्रेमाचा व एकतेचा संदेश देणारी यात्रा स्वातंत्र्याची दुसरी लढाई ठरणारी आहे. देशात सध्या जाती धर्माच्या नावावर मनभेद करण्याचे सोपे राजकारण सुरू असून त्याला प्रत्युत्तर म्हणून प्रेमाचा व एकतेचा संदेश देणारी ही यात्रा आहे. भारताच्या इतिहासात या यात्रेला मोठे अनन्य महत्त्व राहणार असून बेरोजगार, कष्टकरी, कामगार यांच्या विविध प्रश्नांसाठी या यात्रेतून लोकचळवळ उभी राहिली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून ही यात्रा 384 किलोमीटरचा प्रवास करणारा असून 14 दिवसांमध्ये शेगाव येथे दुसरी सभा होणार आहे. या सभेची तयारी आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यामध्ये राज्यातील सर्व काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचा सहभाग असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *