भावी पिढ्यांसाठी वृक्ष संवर्धन काळाची गरज ः देशमुख राजहंस दूध संघाच्यावतीने देवगड परिसरात वृक्षारोपण
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर व परिसर हा अवर्षण प्रवण क्षेत्र आहे. यामुळे येथे कायम कमी पाऊस पडतो. सततचा दुष्काळ व ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी पर्यावरण संवर्धन हे अत्यंत महत्त्वाचे असून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी 17 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या दंडकारण्य अभियानामुळे राज्यासह तालुक्यात वृक्ष संवर्धन संस्कृती वाढली आहे. आगामी काळात हीच परंपरा जोपासत संपूर्ण तालुका हा हिरव्या वनराईचा तालुका निर्माण करण्यासाठी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काम होत असून भावी पिढींकरिता वृक्ष संवर्धन अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा देवगड (देवतळे) येथे दंडकारण्य अभियानांतर्गत संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ संगमनेर व खंडोबा देवस्थान ट्रस्ट देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्षरोपण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र चकोर, लक्ष्मण कुटे, आर. बी. रहाणे, विलास वर्पे, भास्कर सिनारे, संतोष मांडेकर, विलास कवडे, बबन कुर्हाडे, बादशहा वाळुंज, संजय पोकळे, विक्रम थोरात, विष्णू ढोले, तुकाराम दातीर, रवींद्र रोहम, प्रतिभा जोंधळे, गोरख नवले, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी, समन्वयक बाळासाहेब उंबरकर, आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, अॅड. सुरेश जोंधळे, विनायक वैद्य, देवगावचे सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी व माजी सैनिक यांसह राजहंस दूध संघाचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मागील 17 वर्षांपासून दंडकारण्य अभियान राबविले जात आहे. तालुक्यातील उघड्या-बोडक्या डोंगरांवर मोकळ्या जागेमध्ये अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले आहे. वृक्ष संवर्धन ही आता प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारण कोरोना संकटात प्राणवायूचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले. ही परिस्थिती पुन्हा येऊ नये, भविष्यातील पिढ्या सुरक्षित राहाव्यात यावर एकमात्र उपाय म्हणजे वृक्ष संवर्धन आहे. यासाठी प्रत्येकाने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून सहभाग घ्यावा. देवगड परिसर हा तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असून या परिसरात होणार्या वनराईमुळे हा परिसर अधिक सुशोभित होईल असेही ते म्हणाले. यावेळी प्रा. बाबा खरात यांनी पर्यावरण गिते गायली.