श्रीरामपूर पालिकेची एका दिवसांत 33 लाखांची वसुली यंदा सर्वाधिक वसुली झाली असल्याचा अधिकार्यांचा दावा
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
नगरपालिकेने शहरातील विविध भागात मालमत्ता कर व पाणीपट्टी कर थकबाकीदार यांच्यावर तीव्र कारवाई करत एका दिवसात 4 टॉवर व 15 गाळे सील करत 25 जणांची नळ जोडणी तोडत तब्बल 33 लाख रुपयांची वसुली केली आहे. त्यामुळे या वर्षात सर्वाधिक वसुली झाली असल्याचा दावा वसुली अधिकार्यांनी केला आहे.
गुरुवारी (ता.24) एका दिवसात शहरातील कर्मवीर चौक व डॉ. रामराव आदिक चौक परिसरात 1 लाख हजार रुपयांचा रोख वसूल करण्यात आला. प्रभाग दोनमधील उर्दू हायस्कूल मागील परिसरामध्ये थकबाकी पोटी 5 गाळे सील करण्यात आले व 1 लाख 40 हजार रुपये वसूल करण्यात आले. प्रभाग एकमध्ये थकबाकीपोटी एकूण 4 टॉवर सील करण्यात आले. यावेळी 8 लाख 64 हजार 874 रुपये वसूल करण्यात आले. प्रभाग 3 व 4 परिसरात एकूण 3 नळ जोडणी थकबाकीपोटी तोडण्यात आली व 2 लाख रुपये वसूल करण्यात आले.
प्रभाग सहामधील मुख्य रस्ता व नेवासा रस्ता परिसरातील व्यावसायिकांकडून 31 लाख 20 हजार 161 रुपये वसूल करण्यात आले. तसेच 1 दुकान गाळा व 1 टॉवर सील करण्यात आला. तसेच प्रभाग सात परिसरात एकून 7 नळ जोडण्यात आल्या व 2 लाख रुपये वसूल करण्यात आले. तसेच मोरगे वस्ती परिसरात 2 लाख 58 हजार 357 रुपये वसूल करण्यात आले. तसेच पालिकेने हद्दीबाहेर दिलेल्या नळ जोडणीधारकांकडून देखील पाणीपट्टी वसुलीची कार्यवाही करण्यात येणार आहे. यापोटी शहरातील असे एकूण 33 लाख रुपये वसूल करण्यात आले. तरी शहरातील सर्व नळजोडणीधारक व मालमत्ताधारकांनी लवकरात लवकर कर भरणा करून नगरपालिकेस सहकार्य करावे व होणारी कारवाई टाळावी, असे आवाहन प्रशासक तथा प्रांताधिकारी अनिल पवार व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे.