दूध उत्पादन वाढीसाठी राजहंस गोधन योजनेचा लाभ घ्यावा ः थोरात भारतीय स्टेट बँकच्यावतीने राजहंस गोधन कर्ज योजनेचा शुभारंभ

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दुग्ध व्यवसायामुळे ग्रामीण भागात अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. सहकारी दूध संघ हा आपल्या प्रपंचाशी निगडीत असून कायम दूध उत्पादकांचे हित जोपासले आहे. सहकारी दूध संघामुळे उत्पादकांना मोठी शाश्वती असून खाजगी दूध संघांच्या तात्पुरते आमिषाला बळी पडू नका असे सांगताना तालुक्यात गायी व दूध उत्पादन वाढीसाठी दूध संघाने सुरू केलेल्या राजहंस गोधन कर्ज योजनेचा जास्तीत जास्त उत्पादकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघ व भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्यावतीने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात राजहंस गोधन कर्ज योजनेच्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी महानंद व राजहंसचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख हे होते. तर व्यासपीठावर ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, लक्ष्मण कुटे, संपत डोंगरे, स्टेट बँकेचे विभागीय व्यवस्थापक विनोद कुमार, शाखाधिकारी सुनीता नयनार, उपव्यवस्थापक वैभव कदम, सुनील गुरुकर, उपाध्यक्ष राजेंद्र चकोर, वसंत देशमुख, सुनील कडलग, डॉ. गंगाधर चव्हाण, संचालक विलास वर्पे, भास्कर सिनारे, संतोष मांडेकर, विलास कवडे, बबन कुर्‍हाडे, बादशहा वाळुंज, संजय पोकळे, विक्रम थोरात, विष्णू ढोले, तुकाराम दातीर, रवींद्र रोहोम, प्रतिभा जोंधळे, मंदा नवले, सुभाष सांगळे, दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ. प्रताप उबाळे, वर्षा उबाळे, तहसीलदार अमोल निकम, बापूसाहेब गिरी, व्यवस्थापक गणपत शिंदे, डॉ. खिलारी आदी उपस्थित होते. यावेळी 5 शेतकर्‍यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.

पुढे बोलताना नामदार थोरात म्हणाले, सहकारी दूध संघ ही आपल्या हक्काची संस्था आहे. या संस्था आपणच आपल्या जपल्या पाहिजे. दूध व्यवसायात महिलांचेही मोठे काम असून महिलांना संधी मिळाल्यास त्या संधीचे सोने करतात. अडचणीच्या काळात राजहंससह सर्व सहकारी दूध संघ शेतकर्‍यांच्या पाठिशी उभे राहिले आहे. सध्या दूध पावडरचे भाव वाढले असून खासगीवाले काही ठिकाणी भाव वाढून देत दूध गोळा करत आहे. मात्र सहकारी दूध संघ ही तुमच्या जीवाभावाची संस्था आहे. थोडे आमिषाला बळी पडून इकडे-तिकडे आपले दूध न पाठवता सर्वांनी सहकारी दूध संघाच्या पाठिशी भक्कम उभे राहिले पाहिजे. कारण या दूध संघामुळेच खासगीवर नियंत्रण असते. राजहंस गोधन कर्ज योजनेतून अनेक शेतकर्‍यांना गायी खरेदीसाठी मोठा लाभ मिळणार आहे. योग्य पूर्तता करून सर्वांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करताना रणजीतसिंह देशमुख यांनी अत्यंत अडचणीच्या काळामध्ये राजहंस दूध संघ व महानंदमध्ये अत्यंत चांगले काम केले असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख म्हणाले, भारतीय स्टेट बँकेच्या सहकार्याने राजहंस दूध संघाच्या पुढाकारातून राजहंस गोधन कर्ज वितरण योजना कार्यान्वित झाली आहे. या अंतर्गत 20 कोटींचे कर्ज दूध उत्पादकांना मिळणार असून दोन गायींकरीता 1 लाख 60 हजार रुपये कर्ज मिळणार आहे. सध्या या योजनेसाठी 957 उत्पादकांची कर्ज मागणी आहे. पहिल्या टप्प्यात 5 कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहे. यामुळे तालुक्यात गायींची संख्या वाढणार असून परिणामी कुटुंबाला आधार देणारे दूध उत्पादन वाढणार आहे. तर विनोद कुमार म्हणाले, भारतीय स्टेट बँक ही जनतेची बँक असून जनतेची प्रगती करणे. हे या बँकेचे उद्दिष्ट आहे. प्रास्ताविक महानंदचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ व सुरेश जोंधळे यांनी केले तर दूध संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र चकोर यांनी आभार मानले.

डॉ. प्रताप उबाळेंचा सेवापूर्तीनिमित्त सन्मान
अत्यंत विनम्रपणे व अभ्यासपूर्ण 28 वर्षे संघामध्ये काम करताना वीस वर्षे कार्यकारी संचालक पद सांभाळणारे डॉ. प्रताप उबाळे यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम केले. त्यांच्या काळात उपपदार्थ निर्मितीवर भर दिला गेला असे नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना डॉ. प्रताप उबाळे यांना अश्रू अनावर झाले. यामुळे वातावरण अत्यंत भावनिक झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *