मंगळवार दुपारपासून प्रांत कार्यालयासमोर पुन्हा ठिय्या! आज दुपारी देणार स्मरणपत्र; 2012 सालच्या आंदोलनाची होणार पुनरावृत्ती..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरातील गोवंश कत्तलखान्यांवर झालेल्या आजवरच्या सर्वात मोठ्या कारवाईनंतर हिंदुत्त्ववादी संघटनांनी पुकारलेले व नंतर प्रशासनाच्या लेखी हमीनंतर स्थगित करण्यात आलेले आंदोलन मंगळवारपासून पुन्हा सुरु होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या प्रकरणात श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षकांनी सात दिवसांत कारवाईचे आश्वासन देवूनही त्यांच्याकडून अद्याप कोणतीही कारवाई झाल्याचे समोर न आल्याने संगमनेरातील हिंदुत्त्ववादी संघटनांनी आज दुपारी प्रशासनाला स्मरणपत्र देत उद्या दुपारी 12 वाजेपासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर पुन्हा एकदा ठिय्या आंदोलन करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.

गांधी जयंतीच्या दिवशी संगमनेरातील बेकायदा गोवंश कत्तलखान्यांवर अहमदनगर पोलिसांनी मारलेल्या छाप्यात 31 हजार किलो गोवंशाच्या मांसासह एक कोटी रुपयांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला होता. या प्रकरणात पोलिसांनी सात कसायांवर गुन्हे दाखल करुन त्यातील दोघांना अटकही केली होती. या कारवाईदरम्यान संगमनेरातील जमजम कॉलनीतील त्या पाचही कत्तलखान्यात मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल करण्यात आली होती. त्याची छायाचित्रे सामाजिक माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने संपूर्ण तालुक्यात जनक्षोभ उसळला होता.

बजरंग दलासह भारतीय जनता पार्टीने येथील बेकायदा कत्तलखान्यांच्या विरोधात सोमवारी (ता.4) छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून निषेध मोर्चा काढीत प्रांताधिकारी कार्यालयासमोर दिवसभर ठिय्या आंदोलन केले. यावेळी दिवसभर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करीत आपल्या मागण्या पूर्ण होईस्तोवर आंदोलन सुरुच ठेवण्याचा व जोपर्यंत सक्षम अधिकारी आंदोलकांना सामोरे येणार नाही तो पर्यंत मागे न हटण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला होता. आंदोलक आणि अधिकारी यांच्यात दिवसभर चर्चेच्या फेर्‍या होवूनही त्यातून मार्ग निघत नसल्याने आंदोलन चिघळण्याचीही शक्यता निर्माण झाली होती.

यावेळी आंदोलकांकडून गेल्या तीन वर्षात गोवंश कत्तलखान्यांवर झालेल्या कारवायांमधील आरोपी तेच ते असतांनाही त्यांच्यावर हद्दपारीच्या कारवाया का करण्यात आल्या नाहीत. वर्षभरातील गुन्ह्यांचे अवलोकन केल्यास कारवाया झाल्या मात्र तपासी पोलीस अधिकार्‍यांनी जाणीवपूर्वक तपासात अनेक त्रृटी ठेवून आरोपींना निर्दोष सुटण्यास मदतच केली आहे. अशा प्रकरणांची छाननी करुन दोषी असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांनाही त्यात त्या गुन्ह्यात सहआरोपी करावे. संगमनेर शहरात उपविभागीय अधिकारी दर्जाचे वरीष्ठ पोलीस अधिकारी वास्तव्यास असतांना इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय चालू शकत नाहीत. त्यामुळे येथील बेकायदा कत्तलखाने सुरु ठेवण्यात पोलीस निरीक्षकांप्रमाणेच पोलीस उपअधीक्षकही जबाबदार आहेत. या दोघांवरही निलंबनाची कारवाई करुन त्यांची चौकशी करावी.


राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यापासून आजवरच्या दहा वर्षात साडेतीनशेहून अधिकवेळा कारवाया झाल्या आहेत. या कालावधीत शहर पोलीस ठाण्यात सेवा बजावून गेलेल्या अधिकार्‍यांसह छापा पडल्यानंतर जप्त केलेल्या गोवंश मांसाचे नमूने तत्काळ घेवून त्यांना न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविणे आवश्यक असतांना त्यात हलगर्जीपणा करण्यात आला. त्याला दोषी असलेल्या सर्व अधिकार्‍यांवर व पशुवैद्यकीय अधिकार्‍यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाईसह गांधी जयंतीच्या दिवशी कारवाई झालेले पाचही कत्तलखाने जमीनदोस्त करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर तहसीलदारांनी त्याच दिवशी पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना 48 तासांत सदरचे कत्तलखाने उध्वस्त करण्याचे आदेश दिले व त्यानुसार बुधवारी सदरचे कत्तलखाने पाडण्यातही आले.

तर उर्वरीत चारही मागण्या पोलीस विभागाशी संबंधित असल्याने व पोलीस उपअधीक्षक व निरीक्षकांवरच आंदोलकांचा आरोप असल्याने जोपर्यंत सक्षम अधिकारी येवून कारवाईची लेखी हमी देत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नसल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे सोमवारी (ता.4) दुपारीच संगमनेरात आल्या होत्या. मात्र त्यांनी आंदोलन स्थळाला पाठ दाखवित शासकीय विश्रामगृहावरुनच आंदोलकांना सात दिवसांत कारवाई करण्याचे लेखी आश्वास दिले होते. त्याची मुदत आज (ता.11) सायंकाळी संपत आहे.

त्या पार्श्वभूमीवर संगमनेरातील हिंदुत्त्ववादी संघटनांनी रविवारी बैठक बोलावली होती. या बैठकीत आज सोमवारी दुपारी पाच वाजता उपविभागीय अधिकार्‍यांना आपल्या मागण्याबाबत व त्यावर पोलीस प्रशासनाकडून दिलेल्या लेखी हमीबाबतचे स्मरणपत्र देण्याचा निर्णय झाला. आज सायंकाळपर्यंत वरीलप्रमाणे राहिलेल्या चारही मागण्या पूर्ण न झाल्यास मंगळवारी (ता.12) दुपारी 12 वाजेपासून नवीन नगर रस्त्यावरील प्रांताधिकारी कार्यालयासमोर पुन्हा एकदा ठिय्या आंदोलन सुरु करण्याचा निर्णयही या बैठकीत जाहीर करण्यात आला असून गेल्या सात दिवसांतील कारवाईच मागोवा घेता उद्यापासून संगमनेरात पुन्हा आंदोलनाला धार चढण्याचे संकेत मिळत आहेत.

‘त्या’ आंदोलनाची पुनरावृत्ती होणार..!
2012 साली संगमनेरातील हिंदुत्त्वादी संघटनांनी वाहत्या पाण्यातच श्रींचे विसर्जन करण्याची भूमिका घेत आंदोलन पुकारले होते. सुरुवातीला या आंदोलनाची लांबी व रुंदी मोजण्यात प्रशासनाला सपशेल अपयश आल्याने प्रत्यक्ष विसर्जनाच्या दिवशी आंदोलनाची धार कमी होईल असा अंदाज लावला गेला होता. मात्र प्रत्यक्षात आंदोलनासाठी रस्त्यावर न उतरताही शहर व परिसरातील सुमारे 25 हजार घरगुती गणपतींसह सार्वजनीक मंडळांच्या सर्व श्रींचे विसर्जन तब्बल 19 व्या दिवशी झाले होते. त्या आंदोलनाप्रमाणेच हे आंदोलनही हिंदू धर्मियांच्या आस्थेशी निगडीत असल्याने उद्यापासून सुरु होणार्‍या आंदोलनातून 2012 ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आता वर्तविली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *